तेरवाड बंधाऱ्यात मृत माशांचा खच
हिवाळ्याच्या सुरुवातीला पंचगंगा नदीला काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, दूषित पाण्यामुळे नदीच्या काठावरील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील, स्वस्तिक पाटील, महावीर नाईक आणि विशाल चौगुले यांनी जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले आहे. त्यांनी औद्योगिक वसाहतीतून रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अद्यापही घटनास्थळी हजर झालेले नाहीत, यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी यावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नदीचे पाणी दूषित होत असल्याने पर्यावरणासह स्थानिक लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
टिप्पण्या