क्रांति चौक ते जवाहर रोडवरील अतिक्रमण कधी हटविणार?
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू शहराची नगररचना तत्कालीन नगराध्यक्ष सेलूचे भाग्यविधाता दलितमित्र श्रीरामजी भांगडीया अतिशय दूरदृष्टीने आखून शहराला अतिशय सुंदर असे रूप दिले होते. शहरातील रस्ते असो,बाजारपेठ असो कृषी केंद्र असो अतिशय सुंदररीतीने रचना करून वैभव प्राप्त करून दिले होते.परंतु दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत चालली,अनेक खेड्यापाड्यातील लोक सेलू शहरात वास्तव्यांसाठी येत गेले त्याच बरोबर लोंकाची गर्दी,भौतिक सुविधा मुळे वाढत चाललेली वाहनांची रेलचेल यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर होत असलेली गर्दी व त्यात रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण यामूळे नागरिकांना होणारा त्रास या सर्व बाबी समोर आल्या त्यामुळे नगररचनेत पन्नास साठ वर्षापूर्वी जे रोड होते ते आज पण तसेच आहेत.क्रांति चौक ते जवाहर रोड हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे तो पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून जसास तसाच असल्याने या रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे त्यात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण म्हणजे कळसच झाला आहे. लोकांना पायी चालत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे. नगरपालिकेने यात लक्ष घालणे अत्यन्त गरजेचे आहे पण त्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नसल्याने लोकांची तारांबळ होत आहे. त्यात मोटार सायकल,चारचाकी वाहने जर आली तर सामान्य माणसांना चालणे सुद्धा मुश्किल होत आहे. रस्त्यावर मोकाट जनावर सुद्धा येतात याकडे सुद्धा नगरपालिकेचे लक्ष दिसत नाही.या सर्व गोष्टी लक्षात घेता लोक खरेदी करण्यासाठी येण्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माय बाप नगरपालिका याकडे कधी लक्ष देईल याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथील स्थानिकांना या रोडवरील जे काही अतिक्रमन वाढलेले आहे ते काढून टाकावे,मोठ्या वाहनांना पायबंद घालावे,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,छोटया वाहनांसाठी पार्किगची व्यवस्था करावी.अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
टिप्पण्या